भेदोडा
गांव हा देशाचा नकाशा, गावाहुनी देशाची परीक्षा
गावाची भंगता अवदसा, येईल देशा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या अभंगातून प्रवचनात गावाची महती लोकांना सांगत. पूर्वी देशातील खेडी स्वयंपूर्ण होती. अठरापगड जातीतील लोक वास्तव्य करीत असलेल्या खेड्यात 12 बलुतेदार होते. प्रत्येकाच्या गरजा गावातच भागविल्या जात असत. देशातील खरी संस्कृती ही खेड्यातच जपली जात होती. दिवसभर काबाडकष्ट करून मनोरंजनासाठी रात्रौला भारुड, किर्तन, कथा, दंडार असायचं एकंदरीत पूर्वी गावातील जीवन फारच आनंदित असायचं याला काही अपवाद सुद्धा असायचे शिक्षणाच्या समस्या आरोग्य जातिभेद जास्त प्रमाणात असायचं हे सर्व आपल्या भेदोडा गावात सुद्धा पूर्वी होतं
स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या भेदोडा गावाचा पंचक्रोशीत एक नावलौकिक होता. याला कारण तसे होते. इंग्लंड मध्ये मंचेस्टर हे शहर कापडासाठी फार प्रसिद्ध होतं कापड बनवण्यासाठी लागणारा कापूस हा अमेरिकेतून आयात होत असे. परंतु अमेरिकेत निर्माण झालेल्या शीत युद्धामुळे अमेरिकेतून येणारा कापूस बंद झाला त्यामुळे ब्रिटिशांनी विदर्भातील नागपूर शहर कापड निर्मितीसाठी निवडले व अनेकांना प्रोत्साहन दिले त्यामुळे जमशेदजी टाटा यांनी 1877ला नागपूर येथे एम्प्रेस मिल ची स्थापना केली. व परिसरातील जमिनी ताब्यात घेऊन कापूस उत्पादन करण्यास सुरुवात केली. त्याचाच एक शाखा ( कंपनी )हे स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या गावात स्थापन केली. व कापूस उत्पादन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपल्या गावाचा इतिहास हा एक प्रकारे गौरवशाली असा होता. कंपनीत कामानिमित्त अनेक गावातून खास करून आंध्र प्रदेश मधून आपले पूर्वज आले व इथेच कायमचे स्थायिक झाले. कंपनी काळात लोक गुण्यागोविंदाने रहात असत. दिवाळीच्या दिवशी गावातील भव्य वाड्याभोवती गोळ्या तेलाचे दिवे लावून रोषणाई केल्या जात असत व इतरांना व शेतकऱ्यांना भेटवस्तू दिल्या जात असत तसेच होळी व इतर सण कीर्तन दंडार, कथा या सारखे कार्यक्रम आयोजित करून उत्साहात साजरा केल्या जात असत.एकंदरीत त्या काळा तील गावातील वातावरण आजच्यापेक्षा कितीतरी पटीने आनंदित असायचं याची फक्त आपण कल्पना करू शकतो कारण आपण तो काळ बघितलेला नाही. गावाच्या उत्तरेला जो भव्य दिव्य वाडा होता. तो वाडा बघण्याचे भाग्य आजच्या पिडीला मिळाले नाही. कंपनीत फारशी मालक, रेड्डी मालक, त्यांच्या मदतीला सदाशिव दिवाणजी, अन्वरबेग पटेल, शिवनारायण शर्मा यासारखे त्या काळातील प्रतिष्टीत व्यक्ती होत्या गावातील पहिले पोलीस पाटील अन्वर बेग पटेल, व सरपंच म्हणून शिवनारायण शर्मा यांना मान मिळाला.स्वातंत्र्यपूर्व काळात शाळा ही आत्राम व गादंगीवार यांच्या गोट्यात भरायची. एकच शिक्षक असलेली शाळा फारच शिस्तप्रिय असायची त्यातच गुरुजीचा बेदम मार यामुळे अनेकांनी शाळा अर्धवट सोडली.कालांतराने महाराष्ट्र राज्य निर्मिती नंतर 1961ला शाळेच्या मुख्य इमारतीच्या कामास सुरुवात होऊन शाळेची मुख्य इमारत 1963ला बांधून पूर्ण झाली व शाळेच्या इमारतीचे उदघाटन तत्कालीन आमदार विठ्ठलराव धोटे यांच्या हस्ते झाले. पूर्वी गावात विजेची होय नव्हती म्हणून गावात प्रत्येक चौकात रॉकेल दिव्याचा सोय केल्या जात असत त्यासाठी एक खास व्यक्तीची नेमणूक केल्या गेली. कंपनी काळातील एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी आपल्या गावात खूप मोठा आठवडी बाजार भरायचे. बाजारात परिसरातील दूर दुरून लोक खरेदीसाठी यायचे आपल्या गावातील बाजार त्या वेळेस खूप प्रसिद्ध होता.कालांतराने कंपनी बंद पडली अनेक लोक गाव सोडून गेले सरकारच्या कसेल त्याची जमीन या नियमानुसार लोकांना जमिनी वाटप केल्या गेल्या . यामध्ये गावातील लोकांच्या वाट्याला काही जमिनी आल्या व काहींना काहीच नाही आपल्या गावातील संबंधित व्यक्ती यशोधर बजाज हया महाराष्ट्र मंत्रीमंडळात बांधकाम राज्यमंत्री होऊन गेल्या. आपल्या गावात 1986 ला भिमाजी आत्राम सरपंच असताना ग्रामपंचायतमध्ये पहिला टी. व्ही आला तेव्हा पासून गावाला माहिती तंत्रद्यानाची माहिती झाली.
ज्या शेतीच्या भरोशावर गावात कंपनी आली गाव तयार झाले. गावाला वैभव मिळाले, त्याच गावातील शेती आज ओस पडू लागली, शेतीत पिकत नाही म्हणून शेती सोडणारे आपणास वस्ती वस्ती मध्ये दिसत आहे शेतीतील मालाला योग्य भावा मिळत नाही, शेतीत पिकत नाही तरी देखील माझ्या गावाचं शेतकरी बांधव गावात आज तग धरून उभा आहे
जेव्हा शेतकरी गाव सोडेल, तेव्हा समजायचं गावं संपला म्हणून… तेव्हा माझ्या शिक्षित बांधवाना विनंती की, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानची गरज आहे याचे ज्ञान आपल्या शेतकरी बांधवाना कसे देता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे
